जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या निष्पाप बळींना उल्हासनगरमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली!

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
जम्मू-काश्मीरमधील सौंदर्याने नटलेल्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देश पुन्हा एकदा हादरला आहे. या क्रूर हल्ल्यात निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. देशातील प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात या घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
याच पार्श्वभूमीवर, उल्हासनगरमधील “संभाजी चौक” येथे शिवसेना दगडी शाखा संभाजी चौक (उल्हासनगर-४) यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिनिटभर शांतता पाळून, मेणबत्त्या प्रज्वलित करून देशासाठी बलिदान देणाऱ्या निष्पाप जीवांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या जवानांच्या शौर्याचीही आठवण करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने अतिरेक्यांचा तीव्र निषेध केला आणि अशा हल्ल्यांचा कधीही पाठपुरावा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही केली.
शौर्यटाईम्स आपल्या वाचकांच्या वतीने या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करते.