उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील विविध विकास कामे व नागरी समस्यांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त श्री.अजिज शेख यांची भेट घेतली.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील विविध विकास कामे व नागरी समस्यांसंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त श्री. अजिज शेख यांची भेट घेतली.
या भेटी दरम्यान उल्हासनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहाड पंपिंग स्टेशनवरून एम. आय. डी. सी. मार्फत अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत याठिकाणी महानगरपालिके मार्फत कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाशिवरात्री ही येत्या काही दिवसांवर ठेपली असून अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याच्या सूचना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याना यावेळी दिल्या.
उल्हासनगर – ४ येथील सुभाष टेकडी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ९ फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून याबाबत आयुक्ताकडून आढावा घेतला. सदर पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंदर्भात महानगरपालिकेचा ठराव करण्यात आला असून सदर ठराव जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे सादर करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिति गठित करून लवकरच पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
तसेच सोमवारी #जिल्हाधिकारी यांची भेट घेत उल्हासनगर – ५ येथील निजधाम आश्रमजवळ व भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाजूच्या विनावापर असलेल्या शासकीय जागेवर एम.पी.एस.सी. व यु.पी.एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात यावे. तसेच तमाम सिंधी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या पूज्य चालिया साहेब मंदिरात देश – विदेशातून भाविक तसेच पर्यटक येत असतात. त्यांना राहण्याची सोय त्याचबरोबर त्यांना सिंधू संस्कृतीबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने उल्हासनगर -५ येथील लालचक्की परिसरातील बरेक नं.२१०८ च्या बाजूला असलेल्या शासनाच्या मोकळ्या जागेत “सिंधू भवन व यात्री निवास” उभारण्यात यावे अशी मागणी करत शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानुषंगाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत या प्रस्तावानुसार तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याबाबतही उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहेत.
तसेच उल्हासनगर मधील स्मशानभूमी मध्ये सुरक्षा रक्षक नेमणे तसेच शहरातील विविध समस्यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकी प्रसंगी बाळसाहेबांची शिवसेनेचे उल्हासनगर पूर्व चे शहरप्रमुख श्री.रमेश चव्हाण, उल्हासनगर – पश्चिमचे शहरप्रमुख श्री.भूल्लर महाराज, उपशहरप्रमुख श्री.विजय पाटील, माजी नगरसेवक श्री.राजेंद्र चौधरी, श्री.नाना बागूल, श्री.बळवंत सिंह कहतो, श्री.सुरेश जाधव, महिला शहर संघटक सौ.मनीषा भानुशाली, माजी नगरसेविका सौ.समिधा कोरडे, उप विभाग प्रमुख श्री.आदिनाथ कोरडे, श्री.अनिल मराठे तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री.जमीर लेंगरेकर, श्रीमती करुणा जुईकर, व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.